Thursday, April 30, 2020

पांगुळ

एकेदिवशी गावात पांगुळ आले होते.मी लहान असताना हे पांगुळ मारोतीच्या समोर असलेल्या झाडावर बसून तो गावातल्या सगळ्यांची कुंडली सांगायचा आणि ज्यांना जसे जमेल तसे 'दान' त्याला दिले जायचे.आता परिस्थिती बदलली,पांगुळही आधुनिक झाला.त्याने चक्क माईक हातात घेऊन स्पीकरवरच कुंडल्या सुरू केल्या.आता दानाची जागा पैशाने घेतली.
आज सकाळी सकाळी पांगुळपुराण यासाठी की दान देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत आजही बलुतेदारी गावात घर करून आहे.दान देता आलंच पाहिजे ते दिल्याने वाढते,असे म्हटले जाते.मोठे मोठे मंदिरे याच गोष्टीचे भांडवल करून मोठे होत आहेत.दान गुप्त असावं अस म्हणतात,तरीही दान करणाऱ्याचे फोटो छापून येतात..काही दान गुप्तपणे होतात मात्र ते हुंडीमधे..मला वाटत पैश्यापेक्षाही श्रद्धेच दान करता आलं पाहिजे.ही श्रद्धा,भाव जपला गेला पाहिजे.दानपेटीपेक्षा मनपेटीमध्ये श्रद्धेची वाढ झाली तर देवळात जाण्याची गरज नाही,माणसात असलेला देव खरच आपल्याला खूप देऊन जातो जेव्हा आपण श्रद्धापूर्वक त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करतो.. देव दानापेक्षा श्रध्दावानाच्या पदरात गुपचूप टाकून जातो..हीच श्रध्दा,प्रेम माणसावर केले तर?शेवटी देवही आशिर्वादरुपी दानच आपल्या पदरात टाकत असतो..माणसात देव पाहण्याची प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होईल त्यादिवशी वाढलेले स्तोम कमी होईल..माणसावर श्रद्धापूर्वक प्रेम करा,मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही..ज्या घरात मनःशांती मिळत नाही त्या घरातील माणसे मंदिर शोधायला सुरुवात करतात..घराला मंदिर आणि माणसाला देव मानायला सुरू झाले की नक्कीच प्रेम,आनंद भरभरून व्हायला सुरू होईल

@ संजय जेवरीकर

कान

सकाळी कानावर पडणाऱ्या मंत्रोच्चाराने आज माझे कान तृप्त झाले.कानाने काय ऐकावे हे काही आपल्या हातात नाही,मात्र ऐकून काय साठवून ठेवावे हे आपल्या हातात नक्कीच असावे.हे कान अनेकांमुळे तृप्त झाले आहेत.लतादीदीचे सुमधुर गाणे,किशोरदाचे दर्दभरे गीत,जगजितसिंगाची गझल,भीमसेन जोशींचे अभंग,पूल,वपुंचे कथाकथन,झाकीर हुसेनचा तबला,बिस्मिल्लाहखानची सनई,प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांची व्याख्याने,आफळे बुवांचे कीर्तन आणि आईची जात्यावरची गाणी अश्या कितीतरी जादूयी आवाजाने आपले कान तृप्त झाले आहेत.या सगळ्यांचा धागा एकच तो म्हणजे स्वर,लय आणि भावगर्भता.. किती किती ऐकत राहावं अस नेहमी मला वाटत आलं आहे.या सगळ्यामध्ये सध्याची पिढी हनिसिंगची दिवानी आहे हेही नसे थोडके..डोळ्यांनी पाहावं आणि कानाने ऐकण्याचे काम करावं..तृप्तीची ढेकर आली की समजावं सगळं मनापर्यंत पोचल. कान शांत करण्याची ताकद ज्या शब्दात असते ते पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते..जे आवडत ते पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटणं ही त्या कलाकृतीची कमाल असते.कानात रुंजन घालणारे शब्द ही त्याची किमया असते.दिवसभर त्या शब्दात आपण अडकून पडतो..शब्दांची ताकद अनुभवता येणं ही खरी ऐश्वर्यसंपन्नता आहे.जगायचं असतं शब्दांसाठी आणि मरायचं असतं शब्दांसाठी,म्हणूनच कानसेन होऊन जगणं मला आवडत..कानाच्या कायम तृप्तीसाठी आयुष्यभर मला कानसेन होऊन जगायला आवडेल,मात्र तितकं भरभरून देणारे शब्द कानापर्यंत यायला हवेत,आणि मनाला चिंब भिजवायला हवे...

@ संजय जेवरीकर

आंधळी कोशिंबीर

ाल आम्ही मुले,मुली,भाऊ सगळेच आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळत होतो.डोळ्यावर पट्टी बांधून एकाला पकडायचे मग त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची..आंधळी पर्यंत ठीक आहे मात्र कोशिंबीर का म्हटलं असावं..रुक्ष अशा जेवणात कोशिंबीर जान आणते..कांदा,टोमॅटो,काकडी,दही,तिखट,मीठ आणि थोडी साखर हे सगळं प्रमाणात असले की कोशिंबीर चवदार होते..आपण आयुष्यात प्रत्येकवेळी आंधळी कोशिंबीरच खेळत असतो.लहानपणी मिळालेले चुकीचे मित्र,तरुणपणात आई वडिलांच्या इच्छेखातर घेतलेले चुकीच्या फॅकल्टीचे प्रवेश,पोटापाण्यासाठी पकडलेली नोकरी,चहा पोह्यांवर दिलेली पसंती, रागारागात गाठलेली कोर्टाची पायरी,अंधपणे निवडलेला फॅमिली डॉक्टर,काढलेली भरमसाठ कर्ज आणि न पाहता,वाचता पन्नास पानावर केलेल्या सह्या,घेतलेले क्रेडीट कार्ड हे सगळे आपण डोळ्यावर पट्टी बांधून निर्णय घेतो आणि मग आयुष्याची आंधळी कोशिंबीर आपण बेचवपणे खात राहतो..कुणावर तरी दोष देत आपण जगत राहतो.आपण घेतलेले निर्णय आपण पंच्पक्वांनासारखे सजवून खायला हवेत.कोशिंबिरीत एखादा जरी माप चुकला तरी आपण बेमालूमपणे पोटभर जेवतो की नाही?अस आयुष्य सजवता यायला हवं..डोळ्यावर पट्टी बांधून स्विकारण्याची क्षमता ज्यांच्यात असते त्यांनी त्याला आनंदाने नदीपार करायला हवा..प्रत्येकाच्या आयुष्यात असे नदीपार करणारे आणि आपल्या पाठीवर भोपळा बांधून पोहायला शिकवणारे भेटतच असतात..त्यामुळे आयुष्य आंधळ्या कोशिंबिरीचा एक भाग असला तरी 'ती' कोशिंबीर बेचव होवू देऊ नका..सगळे सप्रमाण घाला आणि आयुष्य लज्जतदार करा लहान मुलांप्रमाणे निरागस..

@ संजय जेवरीकर
पत्रकार